आरटीई साठी उत्पन्न मर्यादा वाढवण्याची मागणी!!

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (RTE) २५ टक्के आरक्षित जागांसाठी पालकांच्या उत्पन्नाची अट एक लाख रुपयांवरून अडीच लाख रुपयांपर्यंत वाढवावी, अशी मागणी भाजपचे माजी ज्येष्ठ नगरसेवक भरत चव्हाण आणि भाजयुमोचे प्रदेश सचिव ओमकार चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. तसेच, राज्य सरकारच्या ‘लाडकी बहीण’ योजनेप्रमाणेच ‘आरटीई’ प्रवेशासाठीही अडीच लाख रुपयांची उत्पन्नमर्यादा ठेवावी, असे त्यांनी सुचवले आहे.

सध्याच्या नियमांनुसार, ‘आरटीई’ अंतर्गत विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवण्यासाठी पालकांचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. मात्र, ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असण्याची अट आहे. यामुळे पालकांना उत्पन्न प्रमाणपत्र मिळवताना अनेक अडचणी येतात, आणि अनेक गरजू विद्यार्थ्यांना आरटीई अंतर्गत प्रवेश मिळू शकत नाही.

समाजातील गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांतील विद्यार्थ्यांना आरटीईचा लाभ मिळावा, तसेच त्यांना दर्जेदार शाळांमध्ये मोफत शिक्षण मिळावे, यासाठी कुटुंबाच्या उत्पन्नाची अट अडीच लाख रुपये करावी, अशी मागणी भरत चव्हाण आणि ओमकार चव्हाण यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली आहे.

दरम्यान, या विषयाकडे विधिमंडळ अधिवेशनात राज्य सरकारचे लक्ष वेधून त्यावर धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांच्याकडेही करण्यात आली आहे.

Leave a Comment