मोठी बातमी! या कंपनीत 9 हजार कर्मचाऱ्यांची भरती ! – Global Customer Service software And Services

Global Customer Service software And Services – देशात बेरोजगारीचं (Unemployment) प्रमाण मोठं आहे. गेल्या दोन ते अडीच वर्षात कोरोनामुळं (Corona) सर्वच क्षेत्रावर परिणाम झाला. यामुळे उद्योग क्षेत्राला मोठा फटका बसला. कोरोना काळात अनेकांना नोकऱ्या (Jobs) गमवाव्या लागल्या. तसंच अनेकांच्या वेतनावरही (Salary) परिणाम झाला. दरम्यान, कोरोना काळात वर्क फ्रॉम होम (Work From Home) ही संकल्पना अनेक कंपन्यांनी नाइलाजाने राबवली; मात्र आता या संकल्पनेचे फायदे जगासमोर आले आहेत. त्यामुळे पुढच्या काळातदेखील ही संकल्पना कायम राहणार हे स्पष्टच आहे.

एका मोठ्या मल्टिनॅशनल कंपनीने भारतात मोठी पदभरती (Recruitment) करण्याची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे या प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवारांना कोणत्याही ठिकाणाहून काम करण्यास परवानगी दिली जाणार आहे. याचाच अर्थ ही कंपनी वर्क फ्रॉम होम ही संकल्पना राबवणार आहे. याचा फायदा कर्मचारी आणि कंपनी अशा दोघांनाही होऊ शकतो. `झी न्यूज हिंदी`ने याविषयी माहिती देणारं वृत्त दिलं आहे.

ग्लोबल कस्टमर सर्व्हिस सॉफ्टवेअर अँड सर्व्हिसेस या कंपनीने (Global Customer Service software And Services) 2022-23 या आर्थिक वर्षात भारतात नऊ हजार उमेदवारांची भरती करण्याची घोषणा मंगळवारी (20 सप्टेंबर) केली. विशेष म्हणजे निवड झालेल्या उमेदवारांना कोणत्याही ठिकाणाहून काम करण्याची सूट दिली जाणार आहे. ही कंपनी आगामी काळात देशाच्या विविध भागातून कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे. कंपनी या कर्मचाऱ्यांची भरती फोन (Phone) आणि चॅटच्या (Chat) माध्यमातून करणार आहे. आंतरराष्ट्रीय ग्राहकांना सुविधा पुरवण्याचं काम भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे.

याबाबत कंपनीच्या भारत आणि अमेरिका क्षेत्राच्या वरिष्ठ उपाध्यक्ष नीना नायर यांनी सांगितलं, `कंपनीला नुकतंच `बीपीओ ऑफ द इयर` या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. अमेरिकेत (America) लास वेगासमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कस्टमर इव्हेंटमध्ये (Customer Event) हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. जगातल्या या सर्वांत मोठ्या कस्टमर इव्हेंटमध्ये अनेक देशांमधल्या कंपन्या सहभागी होतात आणि त्यांची उत्पादनं प्रदर्शित करतात. यामुळे त्यांना नवीन वर्क ऑर्डर मिळतात आणि व्यवसायात वृद्धी होते.`

`भारतात खूप चांगली आणि संघटित टॅलेंटची साखळी आहे. त्यामुळे भारत या क्षेत्रात अग्रेसर आहे. कंपनीद्वारे नवीन तरुणांची भरती केली जाते. त्यांच्यातली कौशल्यं विकसित केली जातात आणि त्यातूनच नवे लीडर्स उदयाला येतात. कंपनीनं मागच्या वर्षी पाच हजार तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली. त्यानंतर त्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स, व्हर्टिकल एक्स्पर्टीज आणि क्लायंट सर्व्हिसेसचं प्रशिक्षण देण्यात आलं. त्यामुळे हे तरुण त्यांच्या कार्यक्षेत्रात उत्तम कामगिरी करत आहेत,` असं नायर यांनी सांगितलं.

Leave a Comment